Friday, June 27, 2008

मला मिळालेली एक प्रतिक्रिया,

सोनल,
थोडं स्पष्टं लिहीते आहे. कृपया राग मानू नये.
मी आणि माझे सोडून दुसर्‍या गोष्टींचा फारसा विचार नं करणे ही वृत्ती फार जास्त दिसून येते. या पोस्टमधे दिलेली कारणे ही फक्त त्या वृत्तीचे समर्थन करण्यासाठी दिली आहेत असे वाटते.
ब्लॉग लिहायला वेळ मिळतो नं? मग उचला की लेखणी दुसर्‍यांसाठी. नाही प्रत्यक्ष काही करता आलं तरी एव्हढं तर करता येईल?
उतू जाणारे दूध, बाळाची शू-शू वगैरे कारणे पुढे करण्याआधी साधना ताई, मंदा ताई आमटे यांची चरित्रे वाचा. त्यांनी कसे सांभाळले आपापले संसार आणि दुसर्‍यांचेही? त्यांनी ही कारणे दिली असती तर?
कथा,कविता,स्वानुभव यातून मराठी ब्लॉगकारांनी बाहेर पडावे असे हरेकृष्णाजींचे म्हणणे आहे ते अगदी योग्य आहे.

माझं मत...

कसंकाय,
पोस्‍ट लिहीली ती इतरांची मतं जाणून घेता यावीत म्‍हणूनच. त्‍यामुळे तुमचं मत वाचून राग यायचा प्रश्‍नंच नाही. तुम्‍ही म्‍हणता ते अगदी खरे आहे. आजच्‍या घडीला माणूस मतलबी बनत चालला आहे, आणि मीही त्‍याला अपवाद नाही. कारण मीही त्‍याच समाजाचा एक घटक आहे. साधना ताई, मंदा ताई आमटे यांची चरित्रे नाही वाचली मी अजून. पण त्‍यांच्‍या कामाबद्‍दल मला नक्‍कीच माहीती आहे आणि मी त्‍याबद्‍दल त्‍यांचा आदरही करते. पण म्‍हणूनच सगळ्‍यांनाच त्‍यांच्‍यासारखं बनता येईल किंवा सगळ्‍यांनीच त्‍यांनी जे आणि जसं केलं तेच आणि तसं करावं याला माझा विरोध आहे. प्रत्‍येक जागृक नागरिक आजच्‍या घडीला जितकं आणि जसं, जमेल तसं सामाजिक बंधन पार पाडतोच आहे हा माझा अनुभव आहे.
आणि मीही त्‍याला अपवाद नाही. किती मोठी पेक्षा किती मनापासून आणि कुठे मदत करतो ते जास्‍तं महत्‍वाचं.

सो, माझी एकच विनंती की चार ओळी वाचून माणसाबद्‍दल मतं बनवू नका. कारण लिखाण हे प्रत्‍येकाच्‍या मानसिकतेचं प्रतिबिंब असतं असं माझं मत आहे. त्‍यामुळे उद्‍याचं लिखाण आजच्‍या मतांपेक्षा वेगळंही असू शकतं. म्‍हणजेच कथा,कविता,स्वानुभव ह्‍याच्‍या पलिकडलंही !!!

- सोनल मोडक

No comments: